नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन!
इंग्रजी नवीन वर्ष आनंदाचा क्षण जरी असला तरी आपापल्या संस्कृतीच्या माध्यमातून नवीन वर्ष साजरे केले पाहिजे. कारण भारतात अनेक धर्म,अनेक पंथ, अनेक भाषा अशा विभिन्नतेतून अखंड भारताची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देश कोणत्या पध्दतीने नवीन वर्ष साजरे करतात याकडे लक्ष न देता आपल्या संस्कृतीच्या व धर्माच्या आधारावर नवीन वर्षाचा कार्यक्रम साजरा करून नववर्षाचे स्वागत करावे.नववर्षाच्या निमित्ताने धर्म, संस्कृती, मानसन्मान,आदरतिथ्य यांच्या संगमातून नवीन वर्षाचे स्वागत करून जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो अशी सर्वांनीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी.कारण फक्त हुल्लडबाजी करून नवीन वर्ष साजरे होत नसुन कौटुंबिकतेच्या माध्यमातून साजरे केले तर याचा आनंद आगळावेगळा दिसून येईल व संपूर्ण कुटुंबात या दिवसाला एक आगळावेगळे स्वरूप येईल.काही युवा वर्ग नवीन वर्षाची मौजमस्ती फक्त नशा पाणी करून करतात व याचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागतात ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करतांना वाढत्या दुर्घटना पहाता मद्य पिवुन वाहन चालवु नये, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर टाळावा, कोणालाही त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन जल्लोष करावा.आपण २०२५ चा विचार केला तर या वर्षात आतंकवाद्यांनी मानवतेला काळीमा फासणारे दोन हल्ले केलेत यामध्ये २२ एप्रिल २०२५ ला पहलगाम येथील अंगावर शहारे येणारा हल्ला व १० नोव्हेंबर २०२५ ला दिल्ली येथील आतंकवादी हल्ला अत्यंत भयानक होता.त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्ष लक्षात येता आतंकवादी कारवायापासुन सर्वांनीच सावध रहाणे गरजेचे आहे.कारण आतंकवादी आपल्या आनंदात जहर घोळु शकतात यालाही नाकारता येत नाही.३१ डिसेंबरला सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत व्हायला पाहिजे.कारण पोलिस विभाग आपल्याच संरक्षणाकरीता नियम बनवित असतात. अपघात होवू नये, अनुचित प्रकार घडू नये व ३१ डिसेंबर सर्वत्र शांततेत आणि आनंदात पार पडावा याच उद्देशाने पोलिस विभागाने सर्वसामान्यांच्या बचावासाठी काही अटी घालून दिलेल्या आहे त्याचे पालन व्हायलाच पाहिजे.कारण देशासह राज्यात दुर्घटनांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणे. यामुळेच देशासह राज्यात अनेक दुर्घटना रोज होतांना दिसतात.त्याचप्रमाणे राज्यासह देशात “हिट ऍड रन” चे प्रमाण सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढल्याने दररोज दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतांना दिसते आणि हा संपूर्ण प्रकार नशेमुळे होत असतो. त्यामुळे नवीन वर्षे साजरे करतांना सतर्कता बाळगुन साजरे करावे अन्यथा “आ बैल मुझे मार”अशी परिस्थिती होवू शकते आणि याचे गंभीर परिणाम आपल्याला व आपल्या परिवाराला भोगावे लागु शकतात.त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाही याची काळजी घेवूनच २०२६ चे स्वागत केले पाहिजे. जनतेला मी आग्रह करतो की २०२६ आला म्हणून जास्त उत्साहित होवू नका, पदोपदी सावधगिरी बाळगा.प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपापल्या संस्कृतींचे अनुकरण करून नवीन वर्षाच्या निमित्ताने आगळावेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अवश्य केले पाहिजे व मंदिर-मज्जीद, गुरूव्दारा,चर्च, बौद्ध विहार इत्यादी अनेक धार्मिक देवस्थानात जाणवु दर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे.यामुळे नवीन ऊर्जा निर्माण होते.कारण इंग्रजी नवीन वर्ष असले तरी आपला धर्म व संस्कृती याला कुठेही खिंडार पडणार नाही व ठेच पोहचणार नाही याची काळजी घेऊन एक उत्साहाचा सण म्हणून सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत करावे.यामुळे जगात नवीन वर्षाच्या निमित्ताने भारतातुन एक चांगला संदेश जाईल. भारताच्या दृष्टीकोनातून वर्षांच्या ३६५ दिवसांचा विचार केला तर आपल्याला कुठे ना कुठे प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व दिसून येते आणि त्या पध्दतीने आपण साजरे करीत असतोच. त्यामुळे नवीन वर्षाला वेगळे रूप न देता आपापल्या संस्कृतींच्या माध्यमातून साजरे करावे हेच आपल्यासाठी नवीन वर्ष ठरेल.कारण जगाच्या पाठीवर भारत विश्व शांतीचे प्रतीक आहे.त्याचपध्दती आपणही नवीन वर्ष साजरे केले पाहिजे. भारतात प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात मोठमोठी नामांकित पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे आहेत.याठीकानी जाऊन भजन-कीर्तनाचा आनंद घेवून नवीन वर्षाचे स्वागत केले तर एक आगळावेगळा उपक्रम दिसून येईल व नवीन चेतना जागृत होईल.आपण दुरच्या पर्यटन स्थळांना भेट देवू शकत नसेल तर जवळच्या पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे.त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या निमित्ताने भजन, कीर्तन,पुजाअर्चना करून जगात चांगला संदेश जावा या उद्देशाने जनजागृती केली पाहिजे.घटते वनक्षेत्र, वाढते औद्योगिकीकरण,शहरीकरण आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे निर्माण होणारे बदलते हवामान यापासून राज्यासह देशात प्रदुषणाची मात्रा दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण सृष्टी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे व सर्वांच्याच आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या रक्षणासाठी वृक्षलागवड होने अत्यंत गरजेचे आहे. याकरीता नववर्षाच्या निमित्ताने भारतासह राज्यातील प्रत्येक व्यक्तीने एकतरी वृक्ष लावले पाहिजे व नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे तेव्हा हा एक जागतिक उपक्रम होईल. देशात १४० कोटी लोकसंख्या आहे यातील अर्ध्या लोकसंख्येने म्हणजे ७० कोटी जनतेने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक जरी झाड लावले तर संपूर्ण भारतात एकाच दिवशी ७० कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम होईल आणि आपल्याला हीरवागार गालीचा दिसून येईल व एकाचवेळी करोडोंच्या संख्येने वृक्ष लागवड झालेली दिसेल.यामुळे “गुरांना चारा व मानवाला शुद्ध हवा” मिळण्यास मोठी मदत होईल. यामुळे प्रदूषणावर मात करून पृथ्वीचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल.नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनीच अवश्य केले पाहिजे परंतु जपून!आपण सर्वांनीच शपथ घेतली पाहिजे की नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन उमंग, नवी आशा, नवीन दिशा निर्माण व्हावी याच उद्देशाने पुढचे पाऊल टाकावे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन ३१ डिसेंबर २०२५ च्या निमित्ताने व २०२६ च्या आगमनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे.यातच नवीन वर्षाचे खरे स्वागत दिसून येईल व २०२६ या नवीन वर्षाचा वृक्षलागवडीचा आगळावेगळा उपक्रम सर्वांनीच अंगीकारला तर अनंत काळापर्यंत हा दिवस सर्वांच्याच स्मरणात राहील व याची सुवर्ण अक्षरात नोंद होईल.नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!जय हिंद !
लेखक: रमेश कृष्णराव लांजेवार: ( स्वतंत्र पत्रकार ) मो.नं.९९२१६९०७७९,नागपूर.

