मुदखेड येथील महात्मा गांधी विद्यालय येथील १९८६ सालच्या दहावीच्या बॅचमधील वर्गमित्रांनी एकत्र येत आपल्या दिवंगत मित्राच्या कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे उलटून गेली असली, तरी शालेय मैत्रीतील जिव्हाळा आणि ऋणानुबंध आजही तितकेच घट्ट असल्याचे या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले.

या मित्रपरिवाराने आपापसांत संवाद साधून ५१,००० रुपये इतकी आर्थिक मदत जमा केली आणि ती संपूर्ण रक्कम टाक कुटुंबाकडे सुपूर्द केली. ही मदत केवळ आर्थिक नव्हे, तर “तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत” हा दिलासा देणारी ठरली.

या मदत उपक्रमात समाजसेवक तथा माजी नगरसेवक कैलास विश्वनाथराव गोडसे, किशोर शेवाळे, धनंजय मामीडवार, निळकंठ पडोळे, सुभाष चौदंते, संजय वटमवार, श्रीकृष्ण देशमुख, लक्ष्मणराव शहाने यांच्यासह १९८६ बॅचमधील सर्व वर्गमित्रांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

मित्रपरिवारातील अनेकजण आज वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असले तरी, संकटाच्या काळात एकत्र येऊन त्यांनी मैत्रीचे ऋण फेडल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली. या उपक्रमातून समाजाला एक सकारात्मक संदेश देण्यात आला की, मैत्री ही केवळ आठवणीपुरती मर्यादित नसून गरजेच्या वेळी आधार देणारी शक्ती असते.

आर्थिक मदत स्वीकारताना टाक कुटुंबीयांनी भावुक होत वर्गमित्रांचे आभार मानले. कुटुंबीयांनी सांगितले की,
“अचानक आलेल्या या संकटात आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. अशा वेळी संतोषच्या मित्रांनी दिलेली ही मदत आणि आधार आम्हाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देणारी आहे.”या मदतीमुळे टाक कुटुंबाला तात्पुरता आर्थिक दिलासा मिळाला असून, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी हा आधार महत्त्वाचा ठरणार आहे.

स्व. संतोष टाक यांच्या अपघाती मृत्यूने अवैध वाळू वाहतुकीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा बेकायदेशीर वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे बळी जात असून, प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
या घटनेमुळे केवळ एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाज अस्वस्थ झाला आहे.

१९८६ बॅचच्या वर्गमित्रांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे मुदखेड शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.
“मैत्री अजूनही जिवंत आहे”, “मानुसकी अजून शिल्लक आहे” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

स्व. संतोष टाक यांच्या दुःखद निधनाने निर्माण झालेल्या पोकळीची भरपाई कोणतीही मदत करू शकत नाही. मात्र, त्यांच्या मित्रांनी दिलेला आधार हा मानवी नात्यांचा, शालेय मैत्रीचा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत आदर्श ठरला आहे.
ही घटना समाजाला शिकवण देणारी आहे की, संकटाच्या काळात एकत्र उभे राहणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे.