येडशीला वीजपुरवठा धाराशिव (उस्मानाबाद) येथून थ्री-फेज पद्धतीने केला जातो. येडशी महावितरण कार्यालयांतर्गत येडशी फीडर, अंबेजवळगा फीडर, जवळा फीडर असे वेगवेगळे फीडर आहेत. मात्र, अंगणवाडी डीपी (९ नंबर डीपी) परिसरात गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक बिघाड वारंवार होत आहेत. कधी फ्यूज उडणे, कधी तार तुटून पडणे, तर कधी अचानक लाईट बंद—या घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

वारंवार वीजखंडितीमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. शीतपेय, दुग्धजन्य पदार्थ, संगणक, वेल्डिंग, सुतारकाम यांसारखी कामे ठप्प होतात. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यास, परीक्षा तयारी बाधित होते. रुग्णालये, दवाखाने, घरगुती उपकरणे यांवरही विपरीत परिणाम होत आहे. पाणीपुरवठा योजना व बोअरवेल्स बंद पडल्याने पाणीटंचाई वाढते.

नागरिकांचे म्हणणे आहे की, येडशी महावितरण कार्यालयात मनमानी कारभार सुरू असून, तक्रारींची दखल घेतली जात नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तरी फोन उचलले जात नाहीत किंवा ठोस उत्तर मिळत नाही. त्यामुळे “माहिती घ्यायची तर कुणाकडे?” असा प्रश्न पत्रकारांसह नागरिक विचारत आहेत.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. येडशी महावितरण कार्यालयातील ऑपरेटरपासून सहाय्यक अभियंता, उपअभियंता, लाईनमन, वायरमन यांची कार्यपद्धती तपासून योग्य कारवाई व आवश्यक बदल्या कराव्यात, अशी ठाम मागणी होत आहे.

नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने सुधारणा झाल्या नाहीत, तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल. येडशीसारख्या मोठ्या गावात वीजपुरवठा हा मूलभूत हक्क असून, तो सातत्याने बाधित होणे अक्षम्य असल्याचे नागरिकांचे मत आहे. एकंदरीत, येडशीतील महावितरणच्या वीजपुरवठ्याची स्थिती गंभीर असून, तातडीच्या प्रशासनिक हस्तक्षेपाची नितांत गरज आहे. ऊर्जामंत्र्यांनी दखल घेऊन पारदर्शक, जबाबदार व ग्राहकाभिमुख व्यवस्था निर्माण करावी, हीच येडशीकरांची अपेक्षा आहे.