मुल्हेर किल्ल्यावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न

महाशिवरात्रीनिमित्त किल्ल्यावरील गणपती मंदिर, दुर्गामाता, बजरंगबली, भडंगनाथ महाराजांच्या मूर्ती तसेच गोमाता पूजन करण्यात आले. या पूजनानंतर भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली.संत सुदामादास महाराजांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करत सांगितले की,“महाशिवरात्र हा केवळ उपासनेचा दिवस नसून आत्मशुद्धी, समाजएकता आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्याचा पर्व आहे.”

संत सुदामादास महाराज व भक्त परिवाराच्या वतीने विशेष फराळ व प्रसाद तयार करण्यात आला.हा प्रसाद उपस्थित हजारो भाविकांना वाटप करण्यात आला.भक्तांसाठी हा प्रसाद केवळ अन्न नसून, संतांच्या कृपेचा प्रसाद मानला जातो.

महाशिवरात्रीनिमित्त दुपारी कुस्तीचा भव्य आखाडा भरवण्यात आला.महंत सुदामादास महाराज यांच्या हस्ते नारळ अर्पण करून कुस्तीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी असंख्य पैलवानांनी कुस्तीच्या मैदानात हजेरी लावली.विजेत्यांना रोख रक्कम, संसार उपयोगी वस्तू, नारळखाऊ तसेच इतर देणग्या देऊन गौरवण्यात आले.हा आखाडा धार्मिकतेसोबतच महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान जपणारा ठरला.

या सोहळ्यास मुल्हेर, मुंगसे, मुंगसेपाडा, नरकोळ, जाखोड, हरणबारी, गोळवाड, केरसाने, ताहाराबाद, जायखेडा, मुंजवाड, सटाणा, पाटणे (ता. मालेगाव) तसेच गुजरात येथून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामुळे मुल्हेर परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुल्हेर किल्ल्यावर भगवान सोमेश्वर महाराजांचे प्राचीन जागृत तीर्थस्थान असून येथे हजारो वर्षांपूर्वीची ऐतिहासिक मंदिरे, प्राचीन वास्तू, पाण्याची टाके, नैसर्गिक पर्यावरण आणि विविध पशुपक्षी पाहायला मिळतात.परंतु किल्ल्यावर जाण्यासाठी सुलभ रस्ता नसल्याने वयोवृद्ध भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.महंत संत सुदामादास महाराजांनी संबंधित शासनाकडे मागणी केली की,“जर या तीर्थक्षेत्राचा योग्य विकास झाला तर पर्यटन वाढेल आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”

भाविकांचा निरोप:

दुसऱ्या दिवशी दुपारी भाविकांनी उपवास सोडून जड अंतःकरणाने भगवान सोमेश्वर महाराजांचे दर्शन घेत किल्ल्याचा निरोप घेतला.महाशिवरात्रीचा हा उत्सव भक्ती, परंपरा, कुस्ती संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला.