अवयवदान करणे ही काळाची गरज – डॉ. रकिबे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

सायखेडा महाविद्यालयात अवयवदान विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
✍️ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मंगळवार दिनांक : १७-फेब्रुवारी -२०२६
सायखेडा (नाशिक) (प्रतिनिधी :अभिन पोटे):-: मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री स्वामी षट्कोपाचार्यजी महाराज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सायखेडा येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत अवयवदान” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्त्व, प्रक्रिया, कायदेशीर बाबी तसेच समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. संजय आर. रकिबे (संचालक, विठ्ठला हॉस्पिटल, पंचवटी) आणि मा. डॉ. सरिता जाधव (माजी प्राध्यापिका, सिडको महाविद्यालय) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. के. एम. खालकर होते.
अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान – डॉ. सरिता जाधव
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. सरिता जाधव यांनी अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी सांगितले की, अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळते.डॉ. जाधव यांनी अवयवदानासंबंधी हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या प्रक्रियांची माहिती दिली. तसेच अवयवदान करताना आवश्यक असणाऱ्या कायदेशीर बाबी, परवानगीची प्रक्रिया आणि समाजात असलेल्या समजुती–गैरसमजुती यांचे निरसन केले.
समाजाची उदासीनता चिंताजनक – डॉ. संजय रकिबे
दुसऱ्या सत्रात डॉ. संजय आर. रकिबे यांनी आपल्या व्याख्यानातून अवयवदान चळवळीचे नाशिक जिल्ह्यातील कार्य स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, स्व. डॉ. भाऊसाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यात अवयवदानाबाबत जागृतीचे कार्य सुरू आहे, मात्र समाजातील उदासीनता ही चिंतेची बाब आहे.डॉ. रकिबे यांनी अवयवदानाचे विविध प्रकार सांगितले. यामध्ये डोळे, त्वचा, यकृत, लिव्हर, किडनी इत्यादी अवयवांचे दान करून अनेकांचे प्राण वाचवता येतात.ते म्हणाले,“आपले अवयव माती होण्यापेक्षा त्याचा उपयोग समाजातील इतर व्यक्तींना झाला, तर ते पुण्याचे सर्वोच्च कार्य ठरेल.”त्यांनी आकडेवारी देत सांगितले की, आज भारतात पाच लाखांहून अधिक लोकांना विविध अवयवांची गरज आहे, पण अवयवदानाची गती अत्यंत संथ आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची वेळ आली आहे.
अवयवदानातून दुसऱ्याला नवे आयुष्य – प्राचार्य डॉ. खालकर
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो. डॉ. के. एम. खालकर यांनी सांगितले की,“कन्यादान, भूदान, अन्नदान यासारखेच अवयवदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला पुन्हा नव्याने जीवन जगण्याची संधी मिळते.”
कार्यशाळेचे यशस्वी आयोजन:
या कार्यशाळेचे संयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक प्रा. सचिन मुरादे यांनी केले.व्यासपीठावर सत्रप्रमुख अभिन पोटे तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता पावशे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. भाग्यश्री पवार यांनी मानले.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम
अवयवदान ही काळाची गरज असून अशा कार्यशाळांमुळे युवकांमध्ये जनजागृती निर्माण होते.
सायखेडा महाविद्यालयात आयोजित ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे.

✍️ दिव्य भारत बीएसएम न्यूज
प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले
