शिरगाव येथे ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ व पालघर मिनी सरस प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन

“पालघर जिल्हा जगाशी जोडला जाणार…” – पालकमंत्री गणेश नाईक यांचा विश्वास

या उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यामध्ये आमदार राजेंद्र गावित, वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर आजिव पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन) एस. पी. रामाराव, उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आदी अधिकारी उपस्थित होते.

तसेच शिरगावचे सरपंच घनश्याम मोरे, प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, सातपाटीच्या सरपंच सीमा भोईर, पालघरचे भूमिपुत्र व राष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर, आयुष म्हात्रे यांच्यासह अनेक सांस्कृतिक व सिने क्षेत्रातील कलाकार – अरुण नलावडे, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे यांचीही उपस्थिती उल्लेखनीय ठरली.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी पर्यटन विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली.शिरगाव, केळवा, सातपाटी, माहीम, चिंचणी, बोर्डी, नांदगाव, वाढराई, एडवन, उसरणी, अर्नाळा तसेच वसई या सर्व किनारपट्टी भागांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“पर्यटकांसाठी सुरक्षा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत निसर्गसौंदर्य अधिक खुलविण्यावर भर दिला जाईल,” असे त्यांनी सांगितले.यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांना डीपीडीसी बैठकीत सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील 300 कोटी वृक्षलागवडीच्या उद्दिष्टाअंतर्गत पालघर जिल्ह्यात 12 कोटी झाडे लावण्याचे नियोजन असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.वणव्यांवर नियंत्रणासाठी चॉपर व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, ड्रोन व एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वन्यजीव हल्ले रोखण्याचे उपाय केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘कोकण सरस’ प्रदर्शनाला चालना देत स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प पालकमंत्री नाईक यांनी व्यक्त केला.भविष्यात प्रवासी जलवाहतूक गुजरातपर्यंत विस्तारण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला.“निधी कमी पडला तरी उभारला जाईल; विकास थांबणार नाही,” असा ठाम विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

‘ग्लोबल कोकण महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून कोकणच्या पर्यटन, उद्योग, स्थानिक उत्पादन आणि सामाजिक एकात्मतेचा नवा मंच ठरत आहे.पालघर जिल्ह्याला जागतिक स्तरावर जोडणारा हा महोत्सव जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.