धाराशिव जिल्ह्यातील खत टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासनाच्या कथित निष्क्रियतेविरोधात शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी जिल्हा परिषदेत अनोखे आंदोलन छेडले. जिल्हा कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) तसेच सेंट्रल बिल्डिंग येथील जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या रिकाम्या खुर्च्यांवर ‘बेशरम’ची फांदी ठेवून त्यांनी निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे कृषी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, “खत वितरणाची प्रक्रिया सुरू आहे,” असे सांगितले जात आहे. तरीही जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थिती आणि अधिकाऱ्यांचा दावा यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येते.

शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त तसेच शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.धाराशिव जिल्ह्यातील खत टंचाईचा प्रश्न आता केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘बेशरम’ आंदोलनाने या प्रश्नाला वेगळा आयाम दिला असून येत्या काही दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जर शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध झाले नाही, तर खरीप हंगाम धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.