दिव्य भारत बीएसएम न्यूज : दि . 4 मार्च 2026

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत येडशीत विकासकामांचा शुभारंभ
कैलास पाटील यांच्या हस्ते रस्ते व स्मशानभूमी विकासाचे लोकार्पण
दिव्य भारत बीएसएम न्यूज : दि . 4 मार्च 2026
येडशी | (प्रतिनिधी सुभान शेख |):– धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धाराशिव–कळंब मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास (घाडगे) पाटील यांच्या हस्ते दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन तसेच सार्वजनिक स्मशानभूमी विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामांमुळे येडशी गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय भर पडणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
येडशी येथील प्रभाग क्रमांक सहामधील जुना चमडा बाजार परिसरात जनता विद्यालय ते जुने रेल्वे स्टेशन या मार्गाचे डांबरीकरण मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच राजू धावणे यांच्या दुकानापासून मारुती मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरणाचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याआधी जुना चमडा बाजार येथील रस्ता १२ फूट रुंदीचा मंजूर होता. मात्र, परिसरातील वाढती वाहतूक व नागरिकांची गरज लक्षात घेऊन आमदार कैलास पाटील यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंता व अभियंत्यांना तातडीने बोलावून रस्त्याची रुंदी १८ फूट करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. वाढीव रुंदीमुळे वाहतुकीची कोंडी टळणार असून सुरक्षिततेतही वाढ होणार आहे.
दि. २ मार्च रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “रस्त्याचे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. कामामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास ग्रामस्थांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे आणि आवश्यक असल्यास काम थांबवावे.” लोकसहभागातून दर्जेदार काम पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी विशेष आवाहन केले.
छत्रपती शहाजीराजे चौकातील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्याचेही उद्घाटन याच वेळी करण्यात आले. श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठा फायदा होणार असून पावसाळ्यातील चिखल आणि अडचणींचा त्रास कमी होणार आहे.
सार्वजनिक स्मशानभूमीच्या विकासासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून स्मशानभूमी परिसरात आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. स्मशानभूमीत स्वच्छता, शेड, पाणीपुरवठा व प्रकाशयोजना आदी कामे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. स्मशानभूमीचेही आमदार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. तसेच लातूर रोड ते चोराखळी रस्त्याच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम पार पडला. हा मार्ग पूर्ण झाल्यास येडशी परिसरातील ग्रामीण भागाचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. यासोबतच येडशी अंतर्गत हायमास्ट दिव्यांसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचाही शुभारंभ करण्यात आला. हायमास्ट लॅम्प बसविल्यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षिततेत वाढ होणार असून बाजारपेठ व प्रमुख चौक अधिक प्रकाशमान होणार आहेत. या सर्व विकासकामांमुळे येडशी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यांची गुणवत्ता सुधारल्याने व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत.
कार्यक्रमास गजानन (भैय्या) नलावडे, चंदन नलावडे, विकास (बिबन) नलावडे, अमोल पवार, अशोकराव देशमुख, मच्छिंद्र पवार, रामलिंग भोसले, बाळासाहेब पवार, सुभान शेख, हैदर पटेल, शमशुद्दीन पटेल, महामुद पटेल, महामुद शेख, बिलाल बागवान, महेबुब बागवान, सतिश नलावडे, विजय नलावडे, गफ्फार पटेल, सत्तार पटेल, सलिम पटेल, विलास काळे, महेश काळे, प्रशांत जाधव, नवनाथ मंजुळे, तानाजी नलावडे, रामकृष्ण नलावडे, विष्णु (तात्या) पवार, बालाजी नागटिळक, सचिन इटकर, फेरोज पटेल, ओमप्रकाश इंगळे, बालाजी नकाते, राजाभाऊ पवार, संकेत कोळी, यशराज नलावडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी आमदार कैलास पाटील यांचे आभार मानले. विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. येडशीतील या विकास उपक्रमांमुळे गावाच्या प्रगतीला नवे बळ मिळणार असून ग्रामीण भागात विकासाची नवी दिशा मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.

दिव्य भारत बीएसएम न्यूज
येडशी संवाददाता : सुभान शेख
