राज्य अन्न आयोगाचा पालघर दौरा : आदिवासी व गरजूंपर्यंत अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर

कुपोषण निर्मूलन, अंत्योदय योजनेचा विस्तार आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाला विशेष निर्देश

whatsapp image 2026 05 21 at 5.28.41 pm (1)

दिव्य भारत बीएस एम न्यूज | दि. २१ मे २०२६
पालघर | (बाळकृष्ण ढोके ):-

whatsapp image 2026 05 21 at 5.28.42 pm
whatsapp image 2026 05 21 at 5.28.41 pm

दि. २१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते जिल्ह्यातील ५२ पात्र कुटुंबांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांनी आपल्या समस्या आणि अडचणी थेट आयोगासमोर मांडल्या. अनेक लाभार्थ्यांनी धान्य वितरणातील तांत्रिक अडचणी, नाव समाविष्ट न होणे, रेशन कार्ड अद्ययावत करण्यातील समस्या याबाबत माहिती दिली. त्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांनी पुरवठा विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.दौऱ्यादरम्यान आयोगाच्या पथकाने केंद्रीय स्वयंपाकगृह, शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि स्वस्त धान्य दुकानदारांच्या कामकाजाचीही प्रत्यक्ष तपासणी केली. शालेय पोषण आहाराची गुणवत्ता, अंगणवाडीतील बालकांना मिळणारा पूरक आहार, तसेच स्वस्त धान्य दुकानांमधील वितरण व्यवस्थेची पडताळणी करण्यात आली. लाभार्थ्यांना वेळेवर आणि दर्जेदार अन्नधान्य मिळत आहे का, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्य अन्न आयोगाचा हा दौरा केवळ आढावा बैठकांपुरता मर्यादित नसून योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासण्यावर आधारित आहे. दुर्गम आदिवासी भागांतील लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला अधिक संवेदनशील आणि उत्तरदायी बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.

whatsapp image 2026 05 21 at 5.28.41 pm (1)

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक दुर्गम गावांमध्ये अजूनही मूलभूत सुविधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत अन्न सुरक्षा योजना आणि अंत्योदय योजना या अनेक कुटुंबांसाठी जीवनावश्यक आधार ठरत आहेत. त्यामुळे राज्य अन्न आयोगाच्या या दौऱ्यामुळे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील वंचित, गरीब आणि गरजू घटकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचवून कुपोषणमुक्त आणि भिकमुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करावे, असा स्पष्ट संदेश या दौऱ्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
दिव्य भारत बीएस एम न्यूज | दि. २१ मे २०२६