ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय तात्काळ पंचनामे करा; पूरग्रस्तांना विलंब नको – आमदार विलास तरे
दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार ,दिनांक : 12 जुलै 2026
अधिवेशन संपताच प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक; पूरग्रस्तांना तातडीची मदत, जलनिस्सारण सुधारणा, आरोग्य, वीज व कृषी नुकसानभरपाईबाबत महत्त्वाचे निर्देश
पालघर | (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके):-

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होताच बोईसर विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आमदार विलास तरे यांनी तातडीने प्रशासनाची संयुक्त बैठक बोलावून पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी व्यापक नियोजन केले. जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीत महसूल, वसई-विरार शहर महानगरपालिका, महावितरण, आरोग्य, कृषी, सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा तसेच इतर संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विविध सूचना व निर्देश देण्यात आले.बैठकीला शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागात झालेल्या नुकसानाचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शासनाची मदत पात्र लाभार्थ्यांपर्यंत विलंब न करता पोहोचविण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
आमदार विलास तरे यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक प्रभागामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ आणि पारदर्शक पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणताही विलंब होऊ नये यासाठी महसूल विभाग व महानगरपालिकेने संयुक्त पाहणी करून त्वरित अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. शासनाच्या नियमानुसार पात्र नागरिकांना नुकसानभरपाई आणि मदत तातडीने मिळाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.रग्रस्त भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करून अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत तातडीने करण्यात यावा, असे निर्देशही देण्यात आले. कोणतेही पूरग्रस्त कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही आमदार तरे यांनी सांगितले.बैठकीत शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. अतिवृष्टीदरम्यान पाणी साचण्याची प्रमुख कारणे, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे, गटारांची अपुरी क्षमता आणि जलप्रवाहातील अडथळे यावर स्वतंत्र तांत्रिक अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले. पूर्वी अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक नाल्यांची व गटारांची मूळ रुंदी कायम ठेवून जलप्रवाह सुरळीत राहील, यासाठी आवश्यक ती कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, असेही बैठकीत ठरविण्यात आले.

भविष्यात अशा पूरस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दीर्घकालीन जलनिस्सारण आराखडा तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले. यासाठी महानगरपालिका आणि मंत्रालय स्तरावर स्वतंत्र तांत्रिक बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजनांवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.मौजे राजावली आणि टिवरी परिसरातील महसूल विभागाच्या जमिनींवरील अतिक्रमणांची तातडीने पाहणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशही आमदार तरे यांनी दिले. शहरातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, जलनिस्सारण क्षमतेतील त्रुटी, अभियांत्रिकी सुधारणा आणि पूर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर तांत्रिक अहवाल तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.अतिवृष्टीनंतर नाले, गटारे आणि जलवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा व इतर अडथळे साचल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सर्व नाले व गटारे तातडीने स्वच्छ करून जलनिस्सारण व्यवस्था पूर्ववत करण्यात यावी, तसेच संवेदनशील भागांची नियमित स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
महावितरण विभागाच्या वसई, विरार, पालघर आणि बोईसर विभागातील अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे वीजपुरवठ्यावर झालेल्या परिणामांचा आढावा बैठकीत सादर केला. अनेक भागांत तांत्रिक बिघाड, वीजवाहिन्यांचे नुकसान आणि पुरामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती देण्यात आली. त्यानंतर आमदार तरे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय साधून वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले.पूरानंतर साथीच्या रोगांचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाला विशेष सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक गावात आरोग्य पथके पाठवून नागरिकांची आरोग्य तपासणी करावी, सर्पदंशावरील जीवनरक्षक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, विहिरी व इतर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी करून दूषित पाणी आढळल्यास तातडीने निर्जंतुकीकरण आणि औषधांचे वितरण करावे, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय दोन फिरते दवाखाने प्रत्येक गावात पाठवून नागरिकांवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्यावरही भर देण्यात आला.कृषी क्षेत्रालाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यामुळे कृषी विभागाने शेतजमिनी, पिके आणि शेतीमालाचे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, अशी सूचना आमदार तरे यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण यादी प्रशासनासह स्वतःकडेही सादर करण्यास त्यांनी सांगितले, जेणेकरून शासनाकडून नुकसानभरपाई मिळविण्याची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करता येईल.
बैठकीच्या शेवटी आमदार विलास तरे यांनी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून पूरग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याचे आवाहन केले. शासनाच्या सर्व मदत योजना वेळेत आणि पारदर्शकपणे पात्र नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यावर त्यांनी विशेष भर दिला. त्याचबरोबर भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी जलनिस्सारण व्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन, आरोग्य सुरक्षा, वीजपुरवठा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.या महत्त्वपूर्ण बैठकीस आमदार विलास तरे, शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपविभागीय अधिकारी पालघर श्याम मदनुरकर, उपविभागीय अधिकारी वसई शेखर घाडगे, तहसीलदार वसई दीपक गायकवाड, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चौधरी, वसई-विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी व निलेश म्हात्रे, तालुका कृषी अधिकारी सुरेश जाधव, महावितरणचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तसेच शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत, नुकसानभरपाईची गती, आरोग्य संरक्षण, वीजपुरवठा पूर्ववत करणे आणि भविष्यातील पूरनियंत्रणासाठी दीर्घकालीन नियोजन या सर्व मुद्द्यांवर झालेल्या या बैठकीमुळे प्रशासनाला स्पष्ट दिशा मिळाली असून, पूरग्रस्तांना लवकरात लवकर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार ,दिनांक : 12 जुलै 2026
